
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांनी आता आपल्या न्याय्य हक्कांसाठी पुन्हा एकदा मोठा लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने येत्या १२ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे मोठा मोर्चा व शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कोरोना योद्ध्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात ७ मार्च २०२६ रोजी पद्मालय शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे कंत्राटी कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कोविड काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोरोना महामारीच्या भीषण काळात अनेक जण रुग्णांच्या जवळ जाण्यास घाबरत असताना या कोरोना योद्ध्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड बाधितांची सेवा केली. अनेकांनी आपले घर, कुटुंब, सुरक्षितता बाजूला ठेवून देवदूतासारखी सेवा बजावली. काही कर्मचाऱ्यांना सेवा बजावत असतानाच कोरोनाची लागण झाली, तर काहींच्या कुटुंबीयांनाही या महामारीचा फटका बसला.
मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यामुळे अनेक कोरोना योद्धे आज बेरोजगार झाले असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.
यापूर्वीही महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे निवेदने व आंदोलने करण्यात आली होती. मात्र शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने कोरोना योद्ध्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ३ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निर्देशांनुसार कोरोना काळात किमान १०० दिवस सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत प्राधान्याने सामावून घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून कंत्राटी कोरोना योद्ध्यांना विनाअट शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी जोरदार मागणी बैठकीत करण्यात आली.
या मागण्यांसाठी १२ मार्च रोजी मुंबई येथे जाऊन राज्यातील लोकप्रतिनिधी, मंत्री व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
बैठकीला निलेश बोरा, विनोद सपकाळे, युवराज सुरवाडे, सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक सपकाळे, रमेश वानखेडे (पारोळा), बबन सावळे, यश कुमावत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कंत्राटी कोविड कर्मचारी उपस्थित होते.
तसेच जिल्हा व तालुका स्तरावर समिती मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये रमेश वानखेडे (पारोळा), सागर बळीराम पाटील (चाळीसगाव), भूषण पाटील (नायगाव-यावल), मिलिंद जंजाळे (साकळी-यावल), सागर चौधरी (फैजपूर), युगल जावळे (सावदा), प्रकाश मडावी (मुक्ताईनगर), विक्की पाटील (मुक्ताईनगर), डॉ. तनवीर शेख (बोदवड), विनोद ढगे (बोदवड), समीर शेख (बोदवड), मुकेश कांबळे व आकाश बाविस्कर (जलचकर तांडा-बोदवड), किरण जाधव (भुसावळ), शब्बीर खान (विवरे-रावेर), जयवंत मराठे (चोपडा), प्रशांत सोनवणे (दहिवद-अमळनेर), शंतनु राजपूत (पाचोरा), दिपक महाजन (एरंडोल), अमोल निकम व गौरव धनगर (भडगाव), वैभव जयप्रकाश देशपांडे व सागर चौधरी (जामनेर), सागर वानखेडे (पहूर-जामनेर), धनलाल चव्हाण व अनिल बडगुजर (धरणगाव), प्रेम वानखेडे (पारोळा), सोनल बारेला (रावेर) आदींची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, “कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना न्याय मिळालाच पाहिजे” या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १२ मार्च रोजी मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निलेश बोरा (कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समिती, जिल्हा जळगाव) यांनी केले आहे.






