
प्रशांत बाफना 8055440385
डिजिटल माध्यमांच्या झपाट्याने वाढलेल्या प्रभावामुळे छापील वर्तमानपत्र उद्योग मोठ्या आर्थिक दबावाखाली आला आहे. सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या युगात जाहिरातींचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले आहे. त्याचा थेट परिणाम वृत्तपत्र संस्थांवर होत असून अनेक ठिकाणी पत्रकारितेपेक्षा जाहिरात व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे.
आज अनेक वृत्तपत्र संस्थांमध्ये वार्ताहर, उपसंपादक आणि संपादकांनाही जाहिराती आणण्याचे टार्गेट दिले जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. हे टार्गेट पूर्ण झाले नाही तर संबंधित पत्रकारांवर दबाव आणणे, बदली करणे किंवा थेट नोकरीवरून काढून टाकण्यासारखे प्रकार घडत आहेत. पत्रकारांचे मूळ काम म्हणजे समाजातील घडामोडींचे सत्य आणि जबाबदार वृत्तांकन करणे; मात्र सध्याच्या परिस्थितीत अनेक पत्रकारांना बातम्या लिहिण्याऐवजी जाहिराती मागण्यासाठी फिरावे लागत आहे.
याचा थेट परिणाम पत्रकारितेच्या दर्जावर होत आहे. साहित्य, कला, शिक्षण, संशोधन, सामाजिक उपक्रम यांसारख्या रचनात्मक क्षेत्रातील कार्यक्रमांकडे वृत्तपत्रांकडून दुर्लक्ष केले जात असल्याची खंत अनेक लेखक, कलाकार आणि वाचक व्यक्त करत आहेत. काही वर्षांपूर्वी डिपेक्ससारख्या प्रदर्शनासाठी वृत्तपत्रांकडून स्वतंत्र वार्ताहर पाठवले जात होते; मात्र आता अनेक ठिकाणी जाहिरात संस्थांनी पाठवलेली तयार बातमी छापणे इतकेच काम उरले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाऊन सृजनशीलतेचे कौतुक करणारे पत्रकार कमी होत चालले आहेत.
पत्रकारितेचे मूलभूत तत्त्व म्हणजे सत्य, निष्पक्षता आणि समाजाप्रती जबाबदारी. परंतु जाहिरातींच्या टार्गेटच्या ओझ्याखाली हे तत्त्वच दबले जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रकारांवर जाहिरातींचे टार्गेट लादणे ही केवळ अन्यायकारक बाब नाही तर पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरही घाला आहे.
पत्रकार संघटना आणि संबंधित यंत्रणांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पत्रकारांना जाहिरात एजंट बनवण्याऐवजी त्यांच्या मूळ कामाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अन्यथा पत्रकारिता हा समाजाचा चौथा स्तंभ राहणार नाही, तर तो केवळ व्यवसायिक व्यवहारांमध्ये अडकून पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
समाजातील लोकशाही टिकवण्यासाठी मुक्त आणि स्वायत्त पत्रकारिता अत्यावश्यक आहे. त्यामुळे पत्रकारांवर लादले जाणारे जाहिरातींचे टार्गेट थांबवून पत्रकारितेच्या मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी आता जोर धरत आहे







