
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
सांगवी बुद्रुक परिसरातील गणेश टोल काट्यावर वजनामध्ये तफावत असल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केला आहे. चुकीचा तोल दाखविल्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचा संशय व्यक्त करत शेतकऱ्यांनी सदर टोल काटा तात्काळ व कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी पीक संरक्षण संस्था कार्यालयात आयोजित बैठकीत नागरिक व शेतकऱ्यांनी एकमुखी ठराव मंजूर करून वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
उपसरपंच विकास धांडे यांनी चुकीच्या तोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत टोल काटा त्वरित बंद करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केल्याचे सांगितले. दरम्यान, पुढील कारवाई काय होते याकडे परिसरातील नागरिक व शेतकरी यांचे लक्ष लागले आहे.
टोल काट्यात तफावत असल्याने संबंधित टोल काट्याचे ऑडिट व नियमित तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.







