
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
भुसावळ टोल नाका ते फैजपूर कारखाना दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. बेकायदेशीर वृक्षतोडीची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
या संदर्भात भीम आर्मीचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी व स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी 06 जानेवारी 2026, 06 फेब्रुवारी 2026 व 23 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या स्मरणपत्रांमध्ये वृक्षतोडीची सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराच्या कामाचे बिल थांबवण्याची मागणी केली आहे.
अर्जदारांनी वन परिक्षेत्र अधिकारी (यावल पूर्व) स्वप्निल फटांगरे यांच्याकडे तक्रार दिली असली तरी अद्याप कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, बेकायदेशीर वृक्षतोड सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोठ्या प्रमाणात लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
तक्रारी संदर्भात स्मरणपत्र देताना राहुल जयकर व युनुस तडवी उपस्थित होते.







