
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
सांगवी बुद्रुक ता. यावल महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिर विद्यालय येथे केंद्र क्रमांक ८२० अंतर्गत परीक्षा शांततेत सुरू होईल. या केंद्रावर एकूण ६७६ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत.
या परीक्षा केंद्राअंतर्गत बोरखडा खुर्द, कठोरा, हिंगोणा, भालोद, अट्रावल, सांगवी बुद्रुक तसेच परिसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.
या ठिकाणी कला (आर्ट्स), विज्ञान व वाणिज्य (कॉमर्स) या तिन्ही शाखांतील विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परीक्षा कक्षांची योग्य मांडणी, आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचबरोबर परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासकीय स्तरावरही योग्य नियोजन करण्यात आले आहे.
परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक व्हावी यासाठी दक्षता समिती, केंद्र संचालक, पर्यवेक्षक, पर्यवेक्षण शिक्षक तसेच अतिरिक्त कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार भरारी पथक देखील कार्यरत ठेवण्यात आले आहे.
परीक्षा सुरळीत, शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता राखण्याचे निर्देश देण्यात आले असून अनावश्यक गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनही सज्ज आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी वेळेआधी केंद्रावर उपस्थित राहावे, प्रवेशपत्र व ओळखपत्र अनिवार्यपणे सोबत ठेवावे, तसेच महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्याधपक आर.एम.भंगाळे यांच्याकडून करण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत पालक व नागरिकांनीही संयम राखून सहकार्य करावे, असेही स्पष्ट केले आहे.







