
यावल प्रतिनिधी : राहुल जयकर
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत केवायसी (KYC) प्रक्रियेसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा विरावली (ता. यावल) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. यशश्री देवकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण, ठाम आणि न डगमगणाऱ्या पाठपुराव्याचेच फलित असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात त्यांनी ई-मेल तसेच लेखी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सविस्तर निवेदने सादर करून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले.
महाराष्ट्रभरातून केवायसी मुदतवाढीसाठी जोरदार मागणी होत असताना, अनेक पात्र महिलांना केवळ प्रशासकीय व तांत्रिक अडचणींच्या नावाखाली योजनेपासून वंचित ठेवले जात होते. ही गंभीर बाब यशश्री पाटील यांनी शासनाच्या थेट निदर्शनास आणून दिली होती.
ग्रामीण व दुर्गम भागातील महिला, विधवा, परित्यक्ता, अल्पशिक्षित तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना आधार लिंकिंग, बँक खात्यातील नावातील तफावत, पॅन कार्ड नसणे, विवाहानंतर नाव बदल, जन्मदाखल्यावरील बारकोड किंवा डिजिटल स्वाक्षरीचा अभाव अशा कारणांमुळे केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. या वास्तवाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा ठपकाही त्यांनी आपल्या निवेदनातून स्पष्टपणे ठेवला होता.
या प्रश्नावर त्यांनी अर्थ विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाची उदासीनता उघड केली. अखेर त्यांची दखल घेत शासनाला ३१ मार्च २०२६ पर्यंत केवायसीसाठी मुदतवाढ जाहीर करावी लागली.
यासोबतच महिला व बालविकास विभागाने जिल्हा व तालुका स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला असून महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला नवसंजीवनी मिळाली आहे. यशश्री पाटील यांच्या मागणीला मिळालेले हे यश हे संघर्षशील कार्याचे ठळक उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, ज्या महिला अद्याप काही कारणास्तव योजनेपासून वंचित राहिल्या आहेत त्यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह केवायसी प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन सौ. यशश्री देवकांत पाटील यांनी केले आहे.
शासनाने दिलेल्या या अतिरिक्त संधीचा लाभ घेऊन एकही पात्र महिला वंचित राहू नये, हीच आपल्या पाठपुराव्याची खरी पूर्तता ठरेल, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले आहे.







